ठाणे : अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. ३० आणि ३१ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत टाकलेल्या धाडीत आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलिन सदृश्य स्प्रेचा गैरवापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३,४५३ किलो आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारण्यास मनाई असून सुरक्षित इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र तपासणीदरम्यान काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीत कॅल्शियम कार्बाइडचा वापर आढळला नसला तरी इथिलिन स्प्रेचा चुकीचा वापर स्पष्ट झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
याच कालावधीत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मेदरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून आतापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी ३१ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा गैरप्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोकण विभागाचे सहआयुक्त (अन्न) पराग नलावडे यांनी नागरिकांना अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.







