पंढरपूर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या केल्या जातात. यापैकी आषाढी यात्रा ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. यंदाही आषाढी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातील लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद घेऊनच आपल्या गावी परततो, ही परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. ही बाब लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदा प्रसादाची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे. मंदिर समितीच्या वतीने तब्बल ११ लाख बुंदी लाडू आणि ७५ हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात येत असून, यात्रेच्या संपूर्ण कालावधीत भाविकांना प्रसादाचा कोणताही तुटवडा भासू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती देताना सांगितले की, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा प्रसाद निर्मितीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मंदिर समितीकडून बुंदी लाडूंची निर्मिती थेट केली जात असून, राजगिरा लाडू आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहेत. भाविकांना ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू असलेले एक पाकीट २० रुपयांना, तर २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू असलेले एक पाकीट १० रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे. प्रसाद खरेदीसाठी मंदिराच्या उत्तरद्वाराजवळ आणि श्री संत तुकाराम भवन येथे दोन स्वतंत्र विक्री केंद्रे सुरू करण्यात आली असून, ही केंद्रे यात्रेच्या काळात २४ तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे दर्शनानंतर कोणत्याही वेळी प्रसाद सहज उपलब्ध होणार आहे.
मंदिर समितीने प्रसादाच्या गुणवत्तेलाही तितकेच महत्त्व दिले आहे. बुंदी लाडूंची निर्मिती एमटीडीसी भक्तनिवास परिसरातील आधुनिक लाडू उत्पादन केंद्रात केली जात आहे. या प्रसादासाठी हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची यांसारख्या दर्जेदार साहित्याचा वापर केला जात असून, संपूर्ण प्रक्रिया स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात पार पाडली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच लाडू तयार केले जात असून, शासकीय प्रयोगशाळेमार्फत त्यांची तपासणी करून ते खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रसाद मिळत असल्याची खात्री मंदिर समितीने दिली आहे. प्रसाद निर्मिती, पॅकिंग, साठवण आणि विक्रीची संपूर्ण व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सुमारे ११० कर्मचारी आणि स्वयंसेवक २४ तास कार्यरत आहेत. यात्रेदरम्यान लाखो भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून, प्रसाद विक्री केंद्रांवरही आवश्यक मनुष्यबळ आणि व्यवस्थापन उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असून, दर्शनानंतर श्रींचा प्रसाद सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, हा मंदिर समितीचा प्रमुख उद्देश आहे. भाविकांनी अधिकृत विक्री केंद्रातूनच प्रसाद खरेदी करावा, असे आवाहनही मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.






