पुणे : नीट (NEET) पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बारामतीच्या श्रावणी कुडाळेने देशभरात उल्लेखनीय यश मिळवत राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातही तिने अव्वल स्थान मिळवत बारामतीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. श्रावणीने ७२० पैकी ७१० गुण मिळवले असून, जीवशास्त्रात ३६० पैकी ३६०, तर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांत प्रत्येकी १८० पैकी १७५ गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. तिचे आई-वडील कृष्णा कुडाळे आणि जयश्री कुडाळे हे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असून, मुलीच्या या यशाचा त्यांना मोठा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या यशाची अपेक्षा नव्हती, मात्र श्रावणीच्या मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मूळची दौंड तालुक्यातील खडकी गावची असलेली श्रावणी बारामतीतील एका अकादमीत शिक्षण घेत होती. तिने सातवीत असतानाच नीट परीक्षेची तयारी सुरू केली होती आणि आठवीत डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केले होते. कॉलेजच्या नियमित शिक्षणासोबत ती दररोज सुमारे सहा तास अभ्यास करत होती. डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी तिने अनेक वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेवून सातत्यपूर्ण मेहनत घेतली. नीट पेपरफुटीच्या चर्चेचा आपल्या तयारीवर किंवा आत्मविश्वासावर कोणताही परिणाम झाला नाही, असेही श्रावणीने स्पष्ट केले. श्रावणीच्या या यशानंतर तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचे शिक्षक आणि मार्गदर्शकांनी तिच्या चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी दिल्लीत प्रवेश घेऊन डॉक्टर बनण्याचे आणि देशाची सेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या यशाची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधत मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रावणीच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाचा त्यांना निश्चितच अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तिच्यासोबत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. श्रावणीच्या या यशामुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या बळावर मोठे यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.






