नवी दिल्ली : देशभरात इथेनॉल-मिश्रित E20 पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावर E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याचे अनेक दावे आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना गडकरी यांनी अशा दाव्यांबाबत सरकारकडे किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगितले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, सरकारचे उद्दिष्ट कोणत्याही एका प्रकारच्या इंधनाला प्रोत्साहन देणे नसून, भारताचे जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. भविष्यात ग्राहकांना विविध प्रकारच्या इंधनांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची कल्पना मांडताना त्यांनी शुद्ध पेट्रोलच्या संभाव्य किमतीबाबतही भाष्य केले. त्यांच्या मते, भविष्यात १०० टक्के शुद्ध पेट्रोल स्वतंत्रपणे उपलब्ध झाले, तर त्याची किंमत सुमारे १६८ रुपये प्रति लिटर इतकी असू शकते. त्याउलट इथेनॉल-मिश्रित इंधन तुलनेने स्वस्त राहील, कारण सरकार सध्या इथेनॉलची खरेदी सुमारे ५४ ते ६६ रुपये प्रति लिटर दराने करत आहे. त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
गडकरी यांनी फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाबाबतही माहिती देताना सांगितले की, अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी अशी इंजिने विकसित केली आहेत जी १०० टक्के पेट्रोल, १०० टक्के इथेनॉल किंवा दोन्ही इंधनांवर चालू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, टोयोटा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर काम केले आहे, तर बजाज, टीव्हीएस, हिरो आणि होंडा यांनी फ्लेक्स-फ्युएलवर चालणाऱ्या दुचाकीही विकसित केल्या आहेत. E20 पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होत असल्याच्या दाव्यांवर त्यांनी स्पष्ट केले की, भारतात E20 लागू करण्यापूर्वी अनेक वर्षे विविध स्तरांवर चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारेच त्याला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मक्याचा बाजारभाव १,२०० रुपयांवरून २,६०० ते २,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला असून, त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच साखर कारखान्यांकडील शेतकऱ्यांची थकबाकीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. भारत दरवर्षी पेट्रोलियम आयातीवर लाखो कोटी रुपये खर्च करतो. जैवइंधन आणि इतर पर्यायी इंधनांचा वापर वाढल्यास आयातीवरील खर्च कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल आणि प्रदूषणातही घट होईल, असे त्यांनी सांगितले. २०७० पर्यंत भारताला कार्बन न्यूट्रल बनवण्याच्या उद्दिष्टासाठी इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सोशल मीडियावर E20 संदर्भात सुरू असलेल्या विरोधाबाबत बोलताना काहीजण अपूर्ण माहितीच्या आधारावर अफवा पसरवत असल्याचे सांगत, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.





