रायगड : सामान्य कुटुंबांतील मुलांचा आणि त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता शासनाच्या जिल्हा परिषद शाळा टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. या शाळांमुळेच तळागाळातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती इंदुरिकर महाराज यांनी केले. मावळा प्रतिष्ठान आणि संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित ‘गजर कीर्तनाचा… सोहळा आनंदाचा’ या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत पेण पूर्व विभागातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरात त्यांचे भव्य जाहीर कीर्तन पार पडले. मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीतून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्यांनी अध्यात्म, संस्कार, व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी आणि कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व यांसारख्या विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या विनोदी, ओघवत्या आणि प्रबोधनात्मक शैलीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराजांनी मुलांना केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर चांगले संस्कार मिळावेत यासाठी शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संस्कार असून समाजात सुसंस्कारित पिढी घडविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पेण आणि रायगड परिसरातील मोठा समाज वारकरी संप्रदायाशी जोडलेला असून या भागातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दिंड्या निघतात. त्यामुळे अध्यात्म आणि सामाजिक मूल्ये जपण्याची परंपरा अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.






