भाईंदर : मासेमारी बंदी कालावधीत नियमांचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर आता ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. सागरी पोलिसांनी किनारपट्टीवर विशेष पाहणी मोहीम सुरू केली असून ड्रोनद्वारे समुद्रातील बोटींचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. या पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समुद्रातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी घालण्यात येते. या काळात समुद्रात जाणाऱ्या लहान-मोठ्या नौकांवर कारवाई करण्याचे आदेश सागरी पोलिसांना देण्यात आले आहेत. भाईंदरमधील उत्तन परिसरात सुमारे ७०० मासेमारी नौका असल्याने येथील मच्छिमारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने यंदा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या मदतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
ड्रोनद्वारे गोळा करण्यात आलेल्या छायाचित्रांची आणि व्हिडीओंची मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार असून त्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, या कारवाईबाबत स्थानिक मच्छिमारांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. मासेमारी बंदीच्या काळात उत्तनमधील बहुतांश मच्छिमार समुद्रात जात नसल्याचा त्यांचा दावा आहे. बंदीपूर्वी पकडून आणलेली मासळी बोटीवरील बर्फगृहात साठवून ठेवली असून ती किनाऱ्यावर आणण्यासाठी किंवा विक्रीसाठी नेत असताना त्यांचे फोटो टिपले जात असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मासेमारी आणि साठवलेल्या मासळीच्या वाहतुकीमध्ये फरक ओळखूनच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनीही प्रशासनाने कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, किनारपट्टीवर सुरू असलेल्या सततच्या ड्रोन पाहणीमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






