पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास ‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या माध्यमातून करण्यात येणार असून, कोणावरही अन्याय न करता सर्व संबंधितांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मागील काही वर्षांत मंदिर विकासाची अनेक कामे पूर्ण झाली असून आता भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यंदाच कॉरिडॉरचे काम सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे उपलब्ध होतील, भाडेकरूंची योग्य व्यवस्था केली जाईल आणि सर्वांच्या हिताचा विचार करून विकास आराखडा राबविला जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी त्यांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने दर्शन घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाच्या आषाढी वारीने नवा उच्चांक गाठल्याचे सांगत, दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची रांग लागूनही सुमारे २५ तास प्रतीक्षा करून वारकऱ्यांनी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत दर्शन घेतल्याचे नमूद केले. चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ राहावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवंट परिसरात प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून कचरा, विष्ठा आदींची संपूर्ण साफसफाई करण्यात आल्यामुळे परिसर अधिक स्वच्छ व सुंदर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून केलेली ही शासकीय महापूजा राज्यासह जगभरातील विठ्ठलभक्तांच्या वतीने अर्पण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. वारकरी, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व समाजघटकांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे नमूद करत राज्य शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, मोफत वीजपुरवठ्याचा तसेच थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री आणि राज्य शासनाने मंदिर विकासासाठी दिलेल्या निधीबद्दल तसेच दर्शन रांगेचे प्रभावी व्यवस्थापन आणि वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे त्यांना वर्षभरासाठी मोफत एसटी प्रवास पास प्रदान करण्यात आला. याशिवाय पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धन या विषयांवर जनजागृती करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश प्रदान करण्यात आले.






