मुंबई : तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पारदर्शक कार्यपद्धती आणि करदात्यांसाठी सुलभ सेवा यांमुळे आयकर विभागाने स्वतःला जनस्नेही संस्थेमध्ये रूपांतरित केले असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले. “एकेकाळी ‘भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज ‘जनस्नेही मित्र’ बनला आहे,” असे ते म्हणाले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना आयकर विभागाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. कर महसुलाच्या माध्यमातून सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध कल्याणकारी योजनांची उभारणी शक्य होत असून देशाच्या विकासात आयकर विभागाचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्राचा देशात सर्वाधिक वाटा असून आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने आपले स्थान कायम राखले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे करदात्यांच्या योगदानाची जिवंत उदाहरणे असल्याचे सांगत, या प्रकल्पांमुळे वाहतूक, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यातील सक्षम शहरनिर्मितीला मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अग्रीम कर’ हा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असून प्रत्येक करदात्याने तो आपली सामाजिक जबाबदारी समजून भरावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
यावेळी मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आयकर विभागाच्या डिजिटल परिवर्तनावर प्रकाश टाकला. आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याइतकी सुलभ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये आयकर विवरणपत्रावर प्रक्रिया करण्यासाठी सरासरी ८२ दिवस लागत असताना आता ती काही दिवसांत पूर्ण होत असून कर परताव्याची रक्कमही अत्यंत वेगाने वितरित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आयकर विभाग सर्व शासकीय विभागांमध्ये आघाडीवर असल्याचे सांगत, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मुंबईचे योगदान अनेक राज्यांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात अभिनेते विकी कौशल यांनीही उपस्थित राहून आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आयकर दिनाच्या या समारंभात सहभागी होताना अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.






