पालघर : महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला आहे. मुंबई-गुजरात मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून सूर्या नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुर्झे आणि धामणी धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांचे दरवाजे उघडले. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किराट गावात पुराचे पाणी शिरल्याने २५ नागरिक अडकून पडले होते. अनेकांनी घरांच्या छतांवर आश्रय घेत मदतीची प्रतीक्षा केली. पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे यांच्या आदेशानंतर एनडीआरएफ, मनोर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी स्पीडबोटच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य राबवत सर्व २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनीही या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई-गुजरात मार्गावरील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. दादर–हनुमानगढ एक्स्प्रेस, बांद्रा टर्मिनस–अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद एसी डबल डेकर, बांद्रा टर्मिनस–महुवा सुपरफास्ट, बोरिवली–अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद शताब्दी, मुंबई सेंट्रल–वापी, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद तसेच बांद्रा टर्मिनस–सुरत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत NTES प्रणाली किंवा पश्चिम रेल्वेच्या अधिकृत X हँडलवर गाड्यांची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नवसारी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे आणि नवसारी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्याने पिण्याचे पाणी, चहा आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांत पालघर, ठाणे आणि उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





