जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जातीनिहाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तेरावा दिवस पूर्ण झाला असून, त्यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असताना सरकारकडून मागण्यांवर युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान होणार नसेल तर अंतरवाली सराटी येथे जाणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, त्यांनी घरी जेवायला यावे,” असे केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जरांगे म्हणाले, “अमृता ताई माझ्या ताईच आहेत. त्यांनी बोलावले आहे, त्यामुळे मी नक्की जेवायला जाईन. पण भाऊ जेव्हा मैदानात उतरून समाजासाठी लढत असतो, तेव्हा बहिणीने त्याला जेवायला बोलावू नये. युद्धाच्या किंवा शिकारीच्या वेळी इकडे-तिकडे पाहायचे नसते. मी नक्की येईन, पण भाऊबीजेच्या दिवशी. ताईंनी त्या दिवशी बोलवावे, आम्ही साडी-चोळी घेऊन त्यांच्याकडे जाऊ.” त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चर्चा रंगली आहे.
सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष शिबिरांबाबतही जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ही शिबिरे केवळ आंदोलनामुळे सुरू झाली आहेत की प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, यावर मराठा समाजाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची वाट पाहणे आता सोडून दिल्याचे सांगत त्यांनी शिष्टमंडळ केवळ वरिष्ठांच्या सूचनांनुसार काम करत असल्याचा आरोप केला. पुढील आंदोलनाच्या रणनितीबाबत बोलताना त्यांनी मुंबई मोर्चा काढण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. “जसे दिवस येतील, तसा संघर्ष करावा लागतो. मी मुंबईला जाणार हे आता पूर्णपणे निश्चित आहे. येत्या बारा तारखेला मराठा समाजातील मार्गदर्शक, पदाधिकारी आणि बांधव यांची बैठक होईल. त्यानंतर मुंबई मोर्चाची अंतिम तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारा तारखेला होणाऱ्या बैठकीत मनोज जरांगे पाटील कोणता महत्त्वाचा निर्णय जाहीर करतात आणि मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






