मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवात भव्य आणि आकर्षक गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या खेतवाडीने यंदाही भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. खेतवाडी तिसरी गल्ली सुखकर्ता मंडळात श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक रूपातील तब्बल ३० फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती विराजमान करण्यात आली असून तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या अद्वितीय मूर्तीचे शिल्पकार सुनील वराडकर यांनी आपल्या दीर्घ कलाप्रवासातील अनुभव आणि या मूर्तीमागील मेहनतीची माहिती दिली. मूर्तीकलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला आहे. त्यांचे वडील दिवंगत सदानंद लक्ष्मण वराडकर हे निष्णात शिल्पकार असून त्यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटांचे भव्य सेट, कांस्य धातूचे पुतळे आणि स्मारक शिल्पांची निर्मिती केली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वराडकर यांनी मातीकामाला सुरुवात केली आणि २००२ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ मूर्तीकलेत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या बहिणीचाही मूर्तींच्या प्रारंभिक रेखाटनात आणि संकल्पना तयार करण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. वराडकर कुटुंब गेली तब्बल ७० वर्षे खेतवाडीतील आठवी आणि अकरावी गल्ली तसेच ‘मुंबईचा महाराजा’ मंडळासाठी मूर्ती तयार करत आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणेशमूर्तीची निर्मिती करण्याचाही मान या कुटुंबाला सलग सात दशकांपासून मिळत आहे. यंदाची ३० फूट उंच मूर्ती केवळ आठ दिवसांत पूर्ण करण्यात आली. त्यामागे अचूक नियोजन, मजबूत वेल्डिंग आणि वाहतुकीची आधीच केलेली तयारी हे प्रमुख कारण असल्याचे वराडकर यांनी सांगितले. त्यांनी यापूर्वी गणेश पुराण आणि मुद्गल पुराणाचा अभ्यास करून ‘विनायकी’ रूपातील दुर्मिळ गणेशमूर्तीही साकारली होती. सुरुवातीला त्या संकल्पनेवर टीका झाली होती, मात्र नंतर अभ्यासकांनी तिचे कौतुक केले.
मूर्तीकलेतील बदलांवर बोलताना सुनील वराडकर यांनी पारंपरिक आणि पौराणिक स्वरूप जपण्याची गरज अधोरेखित केली. कार्यशाळेतून मंडपात मूर्ती रवाना होताना घरातील पाहुणा निरोप घेत असल्यासारखी भावना निर्माण होते, त्यामुळे कोणत्याही कलाकृतीवर टीका करण्यापूर्वी तिच्यामागील पौराणिक संदर्भ आणि कलाकाराची मेहनत समजून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या मते बाप्पाला विठ्ठल-रुक्मिणीसारखी धार्मिक आणि पारंपरिक रूपे देणे योग्य असले तरी आधुनिक चित्रपटांतील काल्पनिक पात्रे किंवा नायकांच्या स्वरूपात गणेशमूर्ती घडवणे अयोग्य आहे. धार्मिक परंपरा आणि मूर्तीकलेचा सन्मान कायम राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मूर्ती निर्मितीच्या वाढत्या खर्चाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. इराण आणि दुबईसारख्या देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने पीओपी आणि फायबरच्या किमतींमध्ये ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा मोठा आर्थिक फटका मूर्तिकारांना बसत आहे. वाढत्या खर्चानंतरही दर्जेदार आणि आकर्षक मूर्ती तयार करण्यासाठी कलाकार सातत्याने मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. परंपरा, अभ्यास, आधुनिक नियोजन आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर वराडकर कुटुंब गेली अनेक दशके गणेशोत्सवातील भव्य मूर्तींची परंपरा जपत असून यंदाची स्वामी समर्थ रूपातील ३० फूट गणेशमूर्ती ही त्याच कलावैभवाची आणखी एक उल्लेखनीय साक्ष ठरत आहे.






