मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून, आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनची गती मंदावल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून, विशेषतः २० जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाची नवी मालिका सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत मान्सूनचा वेग कमी झाला होता. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत या प्रणालीचा प्रभाव कमी होऊन देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. सध्या देहराडून, पाटणा आणि बांकुरा परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा दिला असून, सोलापूर, धाराशिव आणि कोकणातील काही संवेदनशील भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात काल झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईतील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली असून, यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर कोकणात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैपासून मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू होणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड या १४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तर स्थानिक प्रशासनानेही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






