वसई : विरार पश्चिम येथील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत चार तरुण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी दोघांना जीवरक्षकांनी वेळेवर बचाव करून सुखरूप बाहेर काढले, तर अन्य दोघे समुद्रात बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेतील डांगेवाडी परिसरात राहणाऱ्या चार तरुणांचा गट पर्यटनासाठी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर आला होता. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना हे चौघे समुद्रात उतरले. मात्र, पावसाळ्यामुळे समुद्रात भरतीची तीव्रता अधिक असल्याने आणि पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने ते लाटांच्या तडाख्यात सापडले व बुडू लागले. किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नांत अब्दुल हमसुद्दीन शेख (१९) आणि साद अफसर खान (१६) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र शोएब खान (१८) आणि अयान झाकीर हुसेन (१९) हे दोघे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी समुद्रात आणि किनारपट्टीवर शोधमोहीम सुरू असून, प्रतिकूल हवामान आणि भरतीमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती येत असल्यामुळे प्रशासनाने अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन आणि समुद्रात उतरण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात सूचना फलकही लावण्यात आले असून नागरिकांना वारंवार सावध राहण्याचे आवाहन केले जाते. तरीही काही पर्यटक जीवरक्षकांची नजर चुकवून समुद्रात उतरतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात, असे प्रशासनाने नमूद केले आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी बेपत्ता दोन्ही तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आणि विशेषतः समुद्रात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.






