वसई : वसई आणि भाईंदर शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या जलवाहतूक सेवेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, हे नवीन वेळापत्रक १ जुलैपासून लागू होणार आहे. पावसाळ्यात समुद्रातील भरती, वेगवान वारे, लाटांची तीव्रता आणि प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वसई आणि भाईंदर या दोन शहरांदरम्यान थेट मार्गाचा अभाव, महामार्गावरील सततची वाहतूककोंडी आणि लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दी यामुळे दररोज ठाणे आणि मुंबईकडे कामासाठी जाणारे अनेक प्रवासी जलवाहतूक सेवेचा पर्याय निवडतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे या सेवेचा वापर सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, तिचे संचालन सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून केले जाते. प्रत्येक जलवाहतूक नौकेमध्ये ३३ वाहने आणि १०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. मात्र, पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे ही सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य देत १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीसाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार वसईहून सकाळी ६.४५ वाजताची फेरी आणि भाईंदरहून सकाळी ७.३० वाजताची फेरी रद्द करण्यात आली आहे. तसेच वसईहून रात्री ८.१५ वाजताची शेवटची फेरी आणि भाईंदरहून रात्री ९.१५ वाजताची शेवटची फेरीही बंद करण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार १ जुलैपासून वसईहून पहिली फेरी सकाळी ८.१५ वाजता सुटणार असून, भाईंदरहून पहिली फेरी सकाळी ९ वाजता सुरू होईल. तसेच वसईहून शेवटची फेरी सायंकाळी ७ वाजता, तर भाईंदरहून शेवटची फेरी सायंकाळी ७.४५ वाजता सुटणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. याशिवाय समुद्रात जोरदार वारे वाहत असल्यास किंवा हवामान विभागाकडून लाल इशारा जारी करण्यात आल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फेऱ्यांमध्ये ऐनवेळी बदल केला जाऊ शकतो किंवा काही फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. अशा वेळी रद्द झालेल्या किंवा उशिराने सुटणाऱ्या फेऱ्यांची अद्ययावत माहिती प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत संदेश गटावर तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे सर्व प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासावा, सुधारित वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा आणि आवश्यक असल्यास अधिक माहितीसाठी सेवा व्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसई-भाईंदर जलवाहतूक सेवेचे व्यवस्थापक अरबाज शेख यांनी केले आहे. त्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिले असून, पावसाळ्यात सुरक्षित आणि नियोजनबद्ध प्रवासासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवे पावसाळी वेळापत्रक (१ जुलैपासून लागू) :
| वसईहून सुटण्याची वेळ (From Vasai) | भाईंदरहून सुटण्याची वेळ (From Bhayander) |
| सकाळी ०८:१५ (पहिली फेरी) | सकाळी ०९:०० (पहिली फेरी) |
| सकाळी ०९:३० | सकाळी १०:०० |
| सकाळी १०:३० | सकाळी ११:१५ |
| दुपारी १२:०० | दुपारी १२:४५ |
| दुपारची सुट्टी (Lunch Break) | दुपारची सुट्टी (Lunch Break) |
| दुपारी ०२:१५ | दुपारी ०३:०० |
| दुपारी ०३:४५ | दुपारी ०४:३० |
| सायंकाळी ०५:१५ | सायंकाळी ०६:०० |
| रात्री ०७:०० (शेवटची फेरी) | रात्री ०७:४५ (शेवटची फेरी) |







