मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) अंतिम टप्प्यात पोहोचले असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली असून, त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांनी आपली माहिती पडताळून गणना प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ नोंदणीकृत मतदारांपैकी आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६०, म्हणजेच ७७.९७ टक्के मतदारांची गणना प्रपत्रे स्वाक्षरीसह प्राप्त झाली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी उर्वरित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळत असून, नागरिकांनी त्यांना सहकार्य करून आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेष सखोल पुनरिक्षणाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनविणे हा असून, चुकीच्या किंवा कालबाह्य नोंदी दूर करून पात्र मतदारांची नावे कायम ठेवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त होण्यास मदत होणार आहे.
गृहभेटीदरम्यान १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ (१९.१७ टक्के) मतदारांची गणना प्रपत्रे जमा होऊ शकली नसल्याची नोंद करण्यात आली आहे. या मतदारांना ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (Uncollectable EF) या प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले आहे. यामध्ये ६३ लाख ६१ हजार ११३ मतदार घरात उपलब्ध नसणे किंवा संपर्क न होणे, ७१ लाख ९५ हजार ३८८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद, ३३ लाख ९४ हजार ५३ मतदार मृत असल्याची माहिती, १६ लाख ६२ हजार १२१ मतदारांची अन्यत्र नोंदणी अथवा दुबार नोंद, तर १ लाख ४३ हजार ५५६ मतदारांचा इतर कारणांमुळे समावेश करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ (९७.१४ टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून, केवळ २७ लाख ९८ हजार ४५८ (२.८६ टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे. ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ या प्रवर्गातील मतदारांच्या याद्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच या याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या असून, काही ठिकाणी त्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यादीत नाव असलेल्या मतदारांनी किंवा त्यांच्या वतीने संबंधित बीएलएंनी बीएलओशी तातडीने संपर्क साधून मतदार प्रत्यक्ष त्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याची माहिती दिल्यास, पुन्हा पडताळणी करून १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्र भरून घेता येणार आहे. या प्रक्रियेबाबत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली असून, बीएलएंनी आपल्या कार्यक्षेत्रातील याद्यांची तपासणी करून पात्र मतदारांची नावे यादीत कायम राहतील यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नागरिकांना अंतिम मुदतीपूर्वी आपली माहिती पडताळून गणना प्रपत्र भरावे, जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार कोणत्याही अडचणीशिवाय बजावता येईल, असे आवाहन केले आहे.






