ठाणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहापूर तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि जिजाऊ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खर्डी विभागातील ३९ गावांमधील शाळांमध्ये मोफत वही वाटपाचा महायज्ञ राबविण्यात आला. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकणात सुरू असलेल्या ३५ लाख मोफत वह्या वाटप अभियानाचा हा एक भाग आहे. या अभियानांतर्गत खर्डी, दळखण चक्र, दळखण, विंचूपाडा, काष्टी, वैतागवाडी, उंबरमाळी, पेठ्याचा पाडा, आंब्याचापाडा, ठाकूरपाडा, फणसपाडा १, फणसपाडा २, विहिरीचापाडा, भगत पाडा, बागेचापाडा, घाणेपाडा, बेडीकोन, पिंपळपाडा, वरस्कोल, गोळभण, धामणी, तलेखन, जरंडी, मुसळेपाडा, वारलीपाडा, करंजपाडा, शिरोल, बोरीच्यापाडा, गोपाळपाडा, कुंडण, गायदरा वरचा, भेरेपाडा, बांदलवाडी, दापूर, अजनूप, कोळीपाडा, मेंगाळपाडा, बोंडरपाडा आणि उठवा या ३९ गावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
जिजाऊ संघटनेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे यांनी या उपक्रमामागील व्यापक उद्देश स्पष्ट करताना, “शहापूरचा तहसीलदार हा शहापूरच्या भूमीतील विद्यार्थी असला पाहिजे. गावागावातून अधिकारी घडवणे हेच जिजाऊचे ध्येय आहे,” असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात असून, त्यांना योग्य मार्गदर्शन, शैक्षणिक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिजाऊ संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ वह्या वाटप करण्यापुरते संस्थेचे कार्य मर्यादित नसून, गावागावातून डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत नेतृत्व करणारी सक्षम पिढी घडवणे हे संस्थेचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. “उद्याचा तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा मोठा अधिकारी हा आपल्या गावातील विद्यार्थी असावा,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. कार्याध्यक्ष धीरज सांबरे, शहापूर तालुका अध्यक्ष तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे, तालुका प्रमुख सुदर्शन पाटील, कुणबी सेनेचे उपतालुका प्रमुख अरुण सातवी यांच्यासह गोपाल वाघ, अशोक वीर, समाधान सांडे, किशोर घरत, फारुख शेख, अनिल मडके, भगवान मोकाशी, दिनेश सदगीर, अक्षय भोईर, विनोद निपुर्ते, कल्पना पानगा, स्वरा सांडे, बाबू सदगीर, प्रकाश कोर, उमेश कोर, गणेश भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. जिजाऊ संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. शिक्षणाच्या वाटेवर कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक गावातून अधिकारी घडावा, या ध्येयाने भविष्यातही शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी विकासाचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.






