पालघर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके आणि शालेय साहित्य वेळेत पोहोचावे, या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेले नियोजन यशस्वी ठरले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के पाठ्यपुस्तकांचे वाटप पूर्ण करण्यात आले असून, गणवेश वितरणानेही ८६ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुरुवात कोणत्याही अडथळ्याशिवाय करता आली असून, पालक आणि शिक्षकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी जिल्ह्यातील २ हजार ५३२ शाळांमधील २ लाख ७३ हजार ७३८ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले होते. त्यानुसार एकूण १५ लाख ५९ हजार ४६९ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये १५ लाख ३५ हजार ७८१ मुख्य पाठ्यपुस्तके, प्रत्येक शाळेसाठी सहा या प्रमाणात १२ हजार ६०० अवांतर वाचनाची पुस्तके तसेच इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कला कार्यानुभव विषयाचे ११ हजार ८८ संच यांचा समावेश होता. शिक्षण विभागाने मागील महिन्यातच ही सर्व पुस्तके जिल्ह्यात उपलब्ध करून घेतली होती. त्यानंतर १५ जूनपासून शाळा सुरू होताच शिक्षकांनी युद्धपातळीवर वितरणाची मोहीम राबवली आणि केवळ दहा दिवसांत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात यश मिळवले. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही वेळेत पुस्तके मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवातीपासूनच गती मिळाली आहे.
दरम्यान, यंदा इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे विज्ञान विषयाच्या काही पुस्तकांच्या छपाई आणि वितरणात तांत्रिक कारणांमुळे थोडा विलंब झाला होता. मात्र, ही पुस्तके येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात दाखल होतील आणि त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना तातडीने त्यांचे वितरण करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पुस्तकांसोबतच गणवेश वितरणाचे कामही वेगाने सुरू असून, जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार पात्र विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे काम सुरू असून, ते जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यंदा गणवेश शिवण्याची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आल्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक वेगाने पार पडत असल्याचेही सांगण्यात आले. शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष काळजी घेतली असून, मुख्य पाठ्यपुस्तकांचे वितरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काही पुस्तके आणि गणवेशांचे वितरणही जूनअखेर पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.







