भाईंदर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणपूरक अथवा शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येणार असून, यासंदर्भातील ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने मूर्ती तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक विक्रेते तात्पुरते मंडप उभारून गणेशमूर्तींची विक्री करणार आहेत. यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जाते आणि त्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाते. मात्र यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापराला चालना देण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने हे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ केवळ शाडूच्या मातीच्या किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या मंडपांनाच मिळणार आहे.
महापालिकेने या निर्णयासोबतच कठोर अटीही लागू केल्या आहेत. संबंधित मंडपात प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा पर्यावरणाला हानीकारक गणेशमूर्तींची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर नियमित शुल्काच्या दहापट दंडाची कारवाई केली जाणार असून, त्या मंडपाची परवानगीही रद्द करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती हसमुख गेहलोत यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गणेशोत्सव हा सांस्कृतिक एकात्मतेचा सण असून तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य शासनाने चार फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असाव्यात, असे निर्देश दिले असून त्यानुसार महापालिकेनेही पर्यावरणपूरक मूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मिरा-भाईंदर शहरातील मूर्तिकारांनी शाडूच्या मातीचा पुरवठा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणारे अनेक मूर्तिकारही शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







