मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर विभागाकडून अन्नसुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू आहेत. अशातच या वातावरणाचा गैरफायदा घेत बनावट अधिकारी बनून हॉटेल व्यावसायिकांना फसविण्याचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील बोरिवली येथे उघडकीस आली आहे. बोरिवली पश्चिम येथील ‘आहार हॉटेल’मध्ये दोन संशयितांनी स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत अचानक तपासणी सुरू केली. हॉटेलमधील अन्नाचे नमुने तपासण्याच्या नावाखाली त्यांनी हॉटेल मालकाला कारवाईची भीती दाखवत दमदाटी केली. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी भारतीय अन्न महामंडळाचे बनावट ओळखपत्रही दाखवले. मात्र, त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती आढळल्याने हॉटेल मालकाला संशय आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर बोरिवली पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दोघांचा बनाव उघडकीस आणला. विजय जाधव आणि स्वाती तुळसकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावट अधिकारी असल्याचे भासविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कठोर कारवायांमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून आर्थिक लाभ उकळण्याचा या बनावट टोळीचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपींनी यापूर्वीही अशाच पद्धतीने इतर हॉटेल व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. अधिकृत अधिकारी तपासणीसाठी आल्यास त्यांच्या ओळखीची खातरजमा करूनच सहकार्य करावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.







