मुंबई : मुंबईतील नद्या, नाले आणि खाड्यांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक तसेच इतर तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून जात असल्याने सागरी पर्यावरणासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने मालाड खाडी येथे ‘द ओशन क्लीनअप’ या जागतिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, ‘प्लास्टिक फिशर’, ‘युनायटेड वे मुंबई’ आणि ‘द ओशन क्लीनअप’ यांच्या संयुक्त सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत मालाड आणि ट्रॉम्बे खाडी परिसरात आधुनिक ‘इंटरसेप्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून नदी-नाल्यांमधून समुद्राकडे वाहून जाणारा प्लास्टिक व इतर तरंगता कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच अडवून संकलित केला जाणार आहे. ‘द ओशन क्लीनअप’ संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबई शहरातून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक कचरा अरबी समुद्रात वाहून जातो. त्यामुळे समुद्रातील जैवविविधता, सागरी जीवसृष्टी आणि किनारी परिसंस्थेवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. विशेष म्हणजे, प्रायोगिक टप्प्यात ‘इंटरसेप्टर’ प्रणालीद्वारे कचरा संकलनाची सेवा बृहन्मुंबई महानगरपालिकेला पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार असल्याने पालिकेच्या सार्वजनिक निधीची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
अलीकडील मुसळधार पाऊस आणि समुद्रातील उधाणाच्या भरतीदरम्यान जुहू समुद्रकिनाऱ्यावर हजारो टन प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र समोर आले होते. नदी-नाल्यांमधून समुद्रात गेलेला कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनाऱ्यावर येत असल्याने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता बिघडते, सागरी जीवसृष्टी धोक्यात येते आणि हा कचरा हटवण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच अडवण्याची ‘इंटरसेप्टर’ प्रणाली अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नदी-नाल्यांमधील तरंगता कचरा नियमितपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावता येणार आहे. परिणामी समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास, किनाऱ्यांची स्वच्छता राखण्यास, सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्यास आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, प्रकल्प यशस्वी ठरल्यास मुंबईतील इतर नद्या, नाले आणि खाड्यांमध्येही अशीच ‘इंटरसेप्टर’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.






