पालघर : पालघर जिल्ह्यात, विशेषतः डहाणू आणि तलासरी तालुक्यात २२ व २३ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे डहाणू ते बोर्डी दरम्यान सुमारे १६० मीटर लांबीचा रस्ता वाहून गेल्याने बोर्डी–चिखला–नरपड मार्गे डहाणू या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. डहाणू तालुक्यात २३ जुलै रोजी २५० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर तलासरी तालुक्यात ५६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे झाई–बोर्डी–रेवस–रेड्डी या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक ४ वरील नरपड-आंबेवाडी परिसरात सुमारे ६० मीटर लांबीचे दोन रस्त्याचे पट्टे पूर्णपणे उखडून गेले. तसेच चिखला-नवाखाडी येथे मातीचा बंधारा फुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी आणि डोंगरातून आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सुमारे ४० मीटर लांबीचा रस्ता आणि भराव वाहून गेला. त्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी मंत्रालय स्तरावर तातडीने पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक मंजुरी मिळवली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, शाखा अभियंता राजेश उमतोल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेकेदारांच्या मदतीने २४ जुलैपासून युद्धपातळीवर काम सुरू केले. अवघ्या तीन दिवसांत रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले. या दुरुस्तीच्या कामासाठी तीन पोकलँड, चार उत्खनक, ४० हून अधिक हायवा डंपर, आठ काँक्रीट मिक्सर आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.
नरपड-आंबेवाडी परिसरात वाहून गेलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे ३०० डंपर डबर आणि २०० डंपर कपची-खडी वापरून भराव टाकण्यात आला. पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी १२ मीटर रुंद आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या सहा रांगांमध्ये पाईप बसवून मजबूत मोरी उभारण्यात आली. विशेष म्हणजे, २००२ मधील पूरस्थितीत याच भागातील रस्ता वाहून गेल्यानंतर ज्या पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्याच धर्तीवर यावेळीही अत्यंत कमी वेळेत मजबूत रस्ता उभारण्यात आला. दरम्यान, चिखला-नवाखाडी येथे भरावासाठी आवश्यक साहित्य पोहोचविण्यासाठी कोणताही संपर्क रस्ता उपलब्ध नव्हता. मात्र नरपड येथील एका मार्गिकेचे काम पूर्ण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथेही विक्रमी गतीने दुरुस्ती सुरू केली. या कामासाठी मनोर आणि किराट परिसरातून गौण खनिज साहित्य, तर वाडा येथून मोरीसाठी लागणारे ३० पाईप उपलब्ध करून देण्यात आले. नियोजनबद्ध काम, यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर आणि प्रशासनाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अशक्य वाटणारे हे काम अवघ्या काही दिवसांत पूर्ण झाले. वाहतूक पूर्ववत झाल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविलेल्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





