पुणे : नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासोबतच अपघातांचे नेमके कारण शोधण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि डॅश कॅम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी रविवारी दिली. सजग नागरिक मंचाच्या वतीने आयोजित मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी पीएमपीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे, मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, संजय शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महेश आव्हाड यांनी सांगितले की, पीएमपीच्या बसांना दरवर्षी सुमारे १० प्राणांतिक अपघातांचा सामना करावा लागतो. अनेकदा मोठ्या वाहनांचा समावेश असल्यामुळे चालकांवर दोषारोप होतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचा दोष नसतो. डॅश कॅमच्या माध्यमातून अपघाताच्या वेळी घडलेली संपूर्ण घटना स्पष्टपणे समोर येईल आणि जबाबदारी निश्चित करणे सोपे होईल. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे यांसारख्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांवर देखील प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन दिवसाला दोन हजारांहून अधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर बसची संख्या वाढविण्याचा निर्णयही पीएमपीने घेतला आहे.
रेल्वे स्थानके, विमानतळ, एसटी स्थानके आणि मेट्रो स्थानकांमधून उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जलद पोहोचता यावे यासाठी बससेवेची वारंवारिता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच बस आणि मेट्रो प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट काढण्याची गरज भासू नये यासाठी ‘वन नेशन, वन कार्ड’ संकल्पनेच्या धर्तीवर एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पीएमपीच्या सुमारे ९ हजार बसथांब्यांपैकी केवळ दीड हजार थांब्यांवर छप्पर उपलब्ध असून उर्वरित साडेसात हजार थांबे अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून या थांब्यांचा कायापालट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नव्या हायटेक बसथांब्यांवर सौरऊर्जेची सुविधा, प्रत्येकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपक यंत्रणा, बसचे वेळापत्रक दर्शविणारे डिजिटल माहितीफलक, कचऱ्याचे डबे आणि शक्य असल्यास पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बदलांमुळे पीएमपीची सेवा अधिक सुरक्षित, आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







