मुंबई : लहान-मोठे खड्डे आणि असमतोल पृष्ठभाग असे चित्र मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर सध्या दिसत आहे. त्यामुळे गणेशोत्सवकाळात गणेश आगमन आणि विसर्जनात रस्त्यांवरील या अडथळ्यांचा सामना करावा लागण्याच्या शक्यतेवरून मुंबईकरांकडून टीका होत आहे. हे अडथळे दूर करण्याची मागणी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली होती. त्यामुळे खड्डे बुजवतानाच रस्ते समतोल करण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यंदाही तीच परिस्थिती असून खड्ड्यांबरोबरच रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर होणाऱ्या असमतोल रस्त्यांचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा मोठा मनस्ताप होत आहे. खड्ड्यांवरूनही मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकांसह अन्य पालिकांवर ताशेरे ओढले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मनुष्यबळाच्या संख्येत वाढ केली असून पूर्वी नेमलेल्या ७५ अभियंत्यांसह प्रत्येक निर्वाचन प्रभागनिहाय अभियंता अशा एकूण २२७ दुय्यम अभियंत्यांची नेमणूक पालिकेने केली आहे. मात्र खराब रस्त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचा फटका गणेशोत्सव मंडळांनाही आगमन आणि विसर्जनावेळी बसण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाआधी रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळ आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने मुंबई महापालिकेकडेही केली होती. त्यानुसार गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या आणि वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच धर्तीवर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्ते सुस्थितीत राखण्याच्या दृष्टीने सर्व विभाग कार्यालयांसह रस्ते विभागाला लेखी निर्देश दिले आहेत. पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश वेलरासू यांनी दिले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या परवानगीनुसार विभागीय सहायक आयुक्त आणि समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांनी गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाचा नकाशा तयार करून आढावा घ्यावा, तसेच विभागीय सहायक आयुक्त यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय साधून खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, गणेशोत्सवासाठी दिलेल्या परवानगीनुसार मंडप उभारणी केल्याने झालेले खड्डे बुजवावेत, असे रस्ते सुस्थितीत करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांची असेल, असेही या आदेशांमध्ये नमूद केले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मॅस्टिक अस्फाल्टचा वापर केला जातो आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवल्यानंतर उंचवटा तयार झालेला आढळल्यास त्याचे समतलीकरण करावे. खड्डा बुजवल्यानंतर निर्माण झालेला उंचवटा समतलीकरणासाठी विभागीय सहायक आयुक्त यांनी मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधावा. वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशीही सूचना केली आहे.





