वसई : वसई तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. वसई पंचायत समितीच्या जागेत भव्य ‘प्रशासकीय भवन’ उभारण्याचा प्रस्ताव आमदार राजन नाईक यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला पालकमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या वसई तालुक्याची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक असून, अनेक शासकीय कार्यालये जुन्या, अपुऱ्या किंवा भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. वसई तहसीलदार कार्यालय जुन्या इमारतीत सुरू असून पंचायत समितीची इमारत धोकादायक घोषित झाल्याने ती रिकामी करण्यात आली आहे. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय, सहकारी संस्थांचे उपनिबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय आणि शिधापूरवठा विभागाची कार्यालये शहरातील विविध ठिकाणी विखुरलेली असल्यामुळे नागरिकांना एका कामासाठी अनेक कार्यालयांत जावे लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याची समस्या सातत्याने पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या परिसरात उपलब्ध असलेल्या प्रशस्त जागेचा उपयोग करून आधुनिक प्रशासकीय भवन उभारण्यात यावे आणि वसईतील राज्य शासनाची सर्व प्रमुख कार्यालये एकाच छताखाली स्थलांतरित करण्यात यावीत, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. यामुळे नागरिकांना सर्व शासकीय सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील, विविध कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी होईल आणि प्रशासनाची कार्यक्षमताही वाढेल, असे त्यांनी नमूद केले. या प्रस्तावाला आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनीही पाठिंबा दिला. पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वसईतील नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि एकाच ठिकाणी शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता हे प्रशासकीय भवन वसईच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.






