ठाणे : ठाणे–डोंबिवली दरम्यानची वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दी यावर पर्याय म्हणून प्रस्तावित जलवाहतूक प्रकल्पाबाबत महत्त्वाची प्रगती झाली आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पांतर्गत डोंबिवलीतील मोठागाव ते ठाण्यातील गायमुख दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम सध्या सुमारे ७० टक्के पूर्ण झाले आहे. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून डिसेंबर २०२६ पासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासोबतच रो-रो सेवाही सुरू करण्याचा मानस आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार असून रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सुरुवातीला या प्रकल्पात कल्याणचाही समावेश होता. मात्र, कल्याण खाडीत मोठ्या खडकांमुळे जलवाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे स्पष्ट झाल्याने २०१९ मध्ये कल्याण शहराला या प्रकल्पातून वगळण्यात आले.
या जलवाहतूक प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६६१ कोटी रुपयांच्या निधीपैकी डोंबिवली जेट्टीसाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे–डोंबिवली दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी नागरिकांकडून अद्याप सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लोकल रेल्वेतील वाढती गर्दी, मेट्रो प्रकल्पाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता जलवाहतूक सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आता निश्चित वेळेत सेवा सुरू होण्याची अपेक्षा असून, डिसेंबर २०२६ मध्ये वॉटर टॅक्सी सुरू झाल्यास ठाणे आणि डोंबिवलीदरम्यानच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






