मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, घाटकोपर, भांडुप आणि कुर्ला परिसरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी येथील भुयारी मार्ग सकाळच्या सुमारास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवाही पावसामुळे प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या सुमारे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील सेवा सरासरी पाच मिनिटे विलंबाने सुरू आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवाही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पाण्याखाली गेलेले रस्ते आणि पूल ओलांडणे टाळावे, झाडे तसेच कमकुवत इमारतींपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि केवळ अधिकृत हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.







