भाईंदर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळांमध्ये दरवर्षी सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांतील असल्याने त्यांच्या शैक्षणिक गरजांची जबाबदारी महापालिकेकडे असते. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश, रेनकोट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत मिळाले नव्हते. विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेली आचारसंहिता तसेच कंत्राटदार निवड प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे साहित्य वितरणाची प्रक्रिया रखडली होती. परिणामी अनेक विद्यार्थी मागील पंधरा दिवस आवश्यक साहित्याशिवाय शिक्षण घेत होते.
विद्यार्थ्यांना साहित्य वेळेत न मिळाल्याबाबत तक्रारी समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने वितरण प्रक्रियेला गती देत मंगळवारी सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर डिंपल मेहता आणि महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या नव्या संगणकीय अध्यापन कक्षांसह इतर आधुनिक शैक्षणिक सुविधांची पूर्तता लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक साहित्याच्या वितरणानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाला अधिक गती मिळणार असून, आगामी काळात अशा प्रकारचा विलंब टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.







