नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि शिस्तबद्ध करण्यासाठी रेल्वेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री करणे, भीक मागणे आणि धूम्रपान करणे यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जन विश्वास कायदा २०२६ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, १९ जून रोजी या बदलांची अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ आर्थिक दंडच नव्हे, तर तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने हे नियम जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १६७ नुसार रेल्वेगाडीत तसेच रेल्वे परिसरात धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, यापूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये लागलेल्या अनेक आगींमागे धूम्रपान किंवा ज्वलनशील पदार्थ कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता धूम्रपान करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वेत धूम्रपान करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून जागेवरच २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. त्याचबरोबर त्या प्रवाशाचे रेल्वे तिकीट किंवा प्रवास परवाना जप्त करून त्याला रेल्वेगाडीतून खाली उतरवण्यात येईल. संबंधित व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. दोष सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून कमाल ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. पुरेसे कारण नसल्यास हा दंड २ हजार रुपयांपेक्षा कमी ठेवला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये अनधिकृतपणे वस्तूंची विक्री करणारे विक्रेते तसेच भीक मागणाऱ्या व्यक्तींमुळे प्रवाशांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या रोखण्यासाठी रेल्वे कायद्याच्या कलम १४४ मध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार रेल्वे प्रशासनाची अधिकृत परवानगी नसताना वस्तूंची विक्री करणाऱ्या किंवा भीक मागणाऱ्या व्यक्तींना अधिकृत रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने चालत्या रेल्वेगाडीतून, फलाटावरून किंवा स्थानक परिसरातून तात्काळ बाहेर काढले जाईल. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दंड न भरल्यास तीन महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास, २ हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकरणांमध्ये किमान एक महिन्यांचा तुरुंगवास किंवा २ हजार रुपयांपेक्षा कमी दंडाची शिक्षा दिली जाणार नाही. याशिवाय एखादी व्यक्ती चौथ्यांदा किंवा त्यानंतर पुन्हा त्याच गुन्ह्यात दोषी आढळल्यास तिच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा वेळी संबंधित व्यक्तीला थेट एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. या शिक्षेमध्ये किमान तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड अनिवार्य करण्यात आला आहे. या नव्या नियमांद्वारे रेल्वे परिसरातील बेकायदेशीर प्रकारांना आळा घालणे, प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आणि रेल्वे प्रवास अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित बनवणे हा रेल्वे प्रशासनाचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.







