वृत्तसंस्था : तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते प्रभावी राजकारणी असा प्रवास करणाऱ्या ‘थलपती’ विजय यांनी ऐतिहासिक कामगिरी करत राज्याच्या सत्ताकारणात मोठे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला असून आता विजय सत्तास्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पक्षाकडून ७ मे, गुरुवार रोजी शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र २३४ सदस्यीय तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी टीव्हीकेला आणखी १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे विजय आणि त्यांच्या पक्षाने संभाव्य मित्रपक्षांशी संपर्क वाढवत राजकीय हालचालींना वेग दिला आहे. काँग्रेस, व्हीसीके (VCK) तसेच डाव्या पक्षांसोबत चर्चा सुरू असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष विजय यांना पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनीही विजय यांनी अधिकृतपणे पाठिंबा मागितल्याची माहिती दिली आहे.
टीव्हीकेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विजय यांनी राज्यपाल व्ही.आर. आर्लेकर यांना ई-मेलद्वारे संपर्क साधून सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरू केली आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्याची विनंती त्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. राजभवनात शपथविधी पार पडण्याची शक्यता असून राज्यपालांकडून वेळ कधी दिला जातो याकडे संपूर्ण तमिळनाडूचे लक्ष लागले आहे. दरम्यान, व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता आघाडी सरकारला पसंती दिल्याचे मत व्यक्त केले आहे. डाव्या पक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, टीव्हीकेचे नेते के.ए. सेंगोट्टइयन आणि आधाव अर्जुना हे एआयएडीएमकेच्या काही आमदारांशी संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पुढील काही दिवस तमिळनाडूच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून विजय यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सत्तासमीकरण आकार घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.







