मुंबई : घाटकोपर–वर्सोवा मेट्रो-१ मार्गिकेवरील वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, १० ऑगस्टपासून घाटकोपर–अंधेरीदरम्यान कमी अंतराच्या विशेष मेट्रो फेऱ्या सुरू करण्यात येणार असून, दररोज सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या आठ विशेष फेऱ्या धावणार आहेत. घाटकोपर–अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने अनेक दिवसांपासून या मार्गावर स्वतंत्र फेऱ्या सुरू करण्याची मागणी होत होती. ती अखेर मान्य करण्यात आली आहे. मुंबईतील पहिली मेट्रो सेवा असलेली घाटकोपर–वर्सोवा मार्गिका २०१४ पासून कार्यरत असून, सध्या या मार्गावर दररोज सरासरी पाच लाख प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येमुळे विशेषतः सकाळी आणि सायंकाळी चार डब्यांच्या मेट्रो गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सहा डब्यांच्या गाड्या सुरू करण्याबरोबरच घाटकोपर–अंधेरीदरम्यान कमी अंतराच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.
एमएमओपीएलने केलेल्या अभ्यासानुसार मेट्रो-१ मार्गिकेवरील तब्बल ८८ टक्के प्रवासी घाटकोपर–अंधेरीदरम्यान प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर या मार्गावर स्वतंत्र फेऱ्यांची चाचणी घेण्यात आली होती. एप्रिल २०२५ मध्ये काही दिवस या विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या होत्या. त्यानंतर या सेवेला कायमस्वरूपी मंजुरी मिळण्याची प्रवाशांना प्रतीक्षा होती. आता १० ऑगस्टपासून ही सेवा नियमित सुरू होणार आहे. एमएमओपीएलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीहून घाटकोपरकडे जाणारी पहिली विशेष मेट्रो दररोज सायंकाळी ६.२३ वाजता सुटेल, तर शेवटची फेरी रात्री ८.२२ वाजता असेल. या आठ अतिरिक्त फेऱ्यांमुळे मेट्रो-१ मार्गिकेवरील एकूण फेऱ्यांची संख्या ४७६ वरून ४८४ इतकी होणार आहे. तसेच गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढून गाड्या प्रत्येक ३ मिनिटे २० सेकंदांनी उपलब्ध होतील. या निर्णयामुळे घाटकोपर–अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




