पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने पुणे महानगरपालिकेने शहरात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पूर्व पुण्यातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेने महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना या पाणीकपातीमधून पूर्णपणे वगळण्यात आले असून त्या परिसरातील नियोजित पाणीकपात मागे घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. गेल्या चार आठवड्यांपासून भामा आसखेड जलयोजनेअंतर्गत येणाऱ्या अनेक भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त होते. त्यातच खेड तालुक्यात सुरू असलेल्या विविध कामांदरम्यान विद्युतवाहिनी खराब झाल्यामुळे काही दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे पाणीकपात लागू न करण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने तातडीने बैठक घेतली आणि जोपर्यंत संबंधित भागांतील गढूळ पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही तसेच शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत पाणीकपात लागू न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वडगावशेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १ ते ६ मधील बहुतांश भागांना मोठा फायदा होणार आहे. विमाननगर, नगर रस्ता परिसर, जय पार्क, म्हाडा कॉलनी, एसआरए वसाहती, कुलकर्णी गॅरेज परिसर, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी आणि वडगावशेरी या परिसरांचा यात समावेश आहे. या भागांना दररोज सुमारे १५७ एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून सुमारे ११ लाख ७० हजार नागरिक या योजनेवर अवलंबून आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीमधून सूट मिळाल्याने पूर्व पुण्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.







