इंदापूर (गणेश धनवडे) : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसाखर संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील कळंब येथे ‘विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूल’ सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शाळेची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, कुलदीप हेगडे, राही रणसिंग, विद्याचरण पुरंदरे, प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम बनवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी भाषेच्या अडचणीमुळे मागे पडतात. ही दरी कमी करण्यासाठी अशा शाळांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्लिश मीडियम शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. तसेच पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले. विद्याचरण पुरंदरे यांनी या शाळेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळेल, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी मानले. यावेळी प्रा. सुहास भैरट, प्रा. रामचंद्र पाखरे, प्रा. विलास बुवा, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






