वसई : वसई-विरार शहरात बुधवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारीही कायम राहिल्याने जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यानंतर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असून, गुरुवार सकाळपर्यंत वसई तालुक्यात सरासरी ९६.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावत शहरातील परिस्थिती चिंताजनक बनवली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, आगाशी मंडळात सर्वाधिक १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पेल्हार मंडळात ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील बहुतांश भागांत सुमारे १०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नालासोपारा सेंट्रल पार्क, गालानगर, विरारमधील विवा महाविद्यालय परिसर, वसई फाटा, सनसिटी, माणिकपूर तसेच इतर अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत असून, काही भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवरही दिसून आला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला असून, मुख्य मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवांवरही पावसाचा काही प्रमाणात परिणाम झाला असून, काही गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीजतारा तुटणे, पावसाच्या पाण्यामुळे विद्युत यंत्रणेत बिघाड होणे आणि तांत्रिक अडचणी निर्माण होणे, यामुळे अनेक परिसरात वीजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला असून, वीजेअभावी शहरातील पाणीपुरवठा तब्बल २४ तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, सखल भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






