पुणे : शेतकऱ्याच्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पुरंदर तालुक्यातील दिवे गावात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तलाठी निलेश सुभाष गद्रे (वय ४२), आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात १आला आहे. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या आजोबांनी बक्षीसपत्राद्वारे ३९ गुंठे जमीन दिली होती. जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याने सोनोरी गावातील तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी गद्रे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गद्रे यांनी लाचेची रक्कम कुंभारकरला देण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कुंभारकरला ताब्यात घेतले. त्यानंतर गद्रे आणि कुंभारकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर आणि पथकाने ही कारवाई केली.