रायगड : किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन (राजसदर) आणि त्याच्याशी संबंधित राज्याभिषेक क्षेत्राचे संवर्धन हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला, त्या ऐतिहासिक स्थळाच्या विशेष दुरुस्तीचे काम सर्वप्रथम १९५३-५४ मध्ये हाती घेण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने राजसदर (दरबार हॉल), सिंहासन आणि नगारखाना येथील कामांचा समावेश होता. या काळात परिसरातील वनस्पती आणि साचलेला राडारोडा हटवून, मूळ वास्तूचे अवशेष उजेडात आणण्यावर आणि त्यांच्या स्थिरीकरणावर भर देण्यात आला होता. त्याच काळात मूळ दगडी स्थळ, ज्यावर सिंहासन स्थापिले होते, त्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सभोवताली घडीव दगडांचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला मजबुती देण्यासाठी आणि भार तोलण्यासाठी आर.सी.सी. तुळई टाकून वरील भाग वीट-सिमेंटने बांधण्यात आला आणि त्यावर मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. तसेच, सिंहासन क्षेत्राकडे जाण्याचा मुख्य औपचारिक मार्ग असलेल्या नगारखान्याच्या मार्गावर दगडी फरसबंदी करण्यात आली.त्या काळात गडावरील शिवकालीन इमारतींचीही डागडुजी करण्यात आली होती. गेल्या काही दशकांत रायगडावरील अतिवृष्टी वादळे यामुळे सिंहासनाच्या मूळ जागेसभोवतालच्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळया, सिमेंट प्लास्टर आणि वीटकाम कमकुवत झाले. परिणामी, सिंहासनाच्या अधिष्ठानाभोवती करण्यात आलेले हे जुने बांधकाम विद्रूप दिसू लागले होते. सन २००९-१० मध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी या मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापित केली, परंतु त्यावेळी मूळ अधिष्ठानालगतचे वीट, माती आणि सिमेंटचे बांधकाम जसेच्या तसे ठेवण्यात आले होते. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली राजवाडा, जगदीश्वर मंदिर, राजसदर आणि महादरवाजा यांचे संवर्धन करण्यात आले. उत्खननातून ६० हून अधिक शिवकालीन वास्तू व अवशेष प्रकाशात आले आहेत. गंगासागर आणि हत्ती तलावातील गाळ काढून, स्वच्छता करून त्यांची जलसाठवण क्षमता वाढवण्यात आली.







