ठाणे : कल्याण–मुरबाड मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या मार्गावर दहा नव्या बसगाड्या सुरू करण्यात आल्यामुळे आता प्रवाशांना नियमित आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर बसफेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना खासगी जीप, सहा आसनी रिक्षा आणि इतर प्रवासी वाहनांमधून अत्यंत दाटीवाटीने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही वारंवार ऐरणीवर येत होता. आता नव्याने उपलब्ध झालेल्या दहा बसगाड्यांमुळे कल्याण आणि मुरबाडदरम्यान पहाटे साडेपाचपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सरासरी दर पंधरा मिनिटांनी बससेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे दररोज शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि अन्य कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर होणार आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी होणारी प्रचंड गर्दी कमी होण्यासही या बससेवेची मदत होणार आहे. या मार्गावर वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत बसफेऱ्या अपुऱ्या असल्याची तक्रार प्रवासी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानंतर अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत होती.
या मागणीला अधिक बळ १३ एप्रिल रोजी घडलेल्या भीषण अपघातानंतर मिळाले. कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर यांच्यात भीषण धडक झाली होती. या दुर्घटनेत इको वाहनात दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या ११ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा मुद्दा गंभीरपणे पुढे आला. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून या मार्गावर अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांनंतर राजमाता जिजाऊ शटल योजनेअंतर्गत दहा नव्या बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. रविवारी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत या नव्या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या दहा बसपैकी पाच बस कल्याण ते मुरबाड आणि पाच बस मुरबाड ते कल्याण या मार्गावर धावणार आहेत. दोन्ही स्थानकांवरून पहिली बस सकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान सुटेल, तर शेवटची बस रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असेल. या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्वही कमी होईल. तसेच रिक्षा आणि जीपमधील धोकादायक प्रवासालाही मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुरबाड आगारप्रमुख योगेश मुसळे यांनी सांगितले की, नव्या बसगाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांना नियमित, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. भविष्यात प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी बसफेऱ्या वाढविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.







