मुंबई : सामान्य प्रशासन विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक-वारी २.० – महाराष्ट्राचा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताह’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे उत्साहात पार पडले. ४ ते ८ मे २०२६ दरम्यान आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील सुमारे १० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा राधा चौहान यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यावेळी उपस्थित होते. राज्याच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध तबला वादक निलेश परब यांच्या ‘तालरंग : लय आणि सांघिक कार्याचा प्रवास’ या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमात डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या बदलांवर विशेष चर्चा झाली.
डिजिटल गव्हर्नन्स विषयावरील विशेष सत्रात माजी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, डीजीपी सदानंद दाते, डॉ. विवेक राघवन, राधा चौहान आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी एआय-आधारित प्रशासन, डिजिटल सेवा आणि भविष्यातील स्मार्ट गव्हर्नन्स यावर मार्गदर्शन केले. याशिवाय मनशक्ती संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, मेंदूची कार्यक्षमता आणि सर्वांगीण विकास यावर सत्रे आयोजित करण्यात आली, तर ‘साथ मेळा होलिस्टिक हेल्थ कॅम्प’द्वारे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्रिमूर्ती प्रांगणाला आधुनिक टेक हबचे स्वरूप देण्यात आले असून येथे १० जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी थेट प्रात्यक्षिके सादर केली. मेटाने शासनासाठी विकसित केलेल्या ‘व्हॉट्सॲप गव्हर्नन्स’ सुविधेमुळे नागरिकांना कोणतेही वेगळे ॲप डाउनलोड न करता केवळ व्हॉइस कमांडद्वारे वीज, आरोग्य आणि पोलीस सेवा मिळू शकणार आहेत. तसेच फ्लॅम.अलच्या एआय-आधारित मिक्स्ड रिॲलिटी प्लॅटफॉर्ममुळे कमी क्षमतेच्या स्मार्टफोनवरही जलद आणि प्रभावी जनजागृती मोहिमा राबवता येणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा यासाठी सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असून ८ मेपर्यंत हे तंत्रज्ञान प्रदर्शन खुले राहणार आहे.







