मुंबई : आज दुपारी अचानक अनेकांच्या मोबाईलवर एक तीव्र आवाजाचा ‘Severe Alert’ मेसेज आणि सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोबाईलमधून कर्कश आवाज आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक स्मार्टफोनवर अचानक एक पॉप-अप मेसेज आला, ज्यासोबत मोबाईल व्हायब्रेट होऊन मोठ्याने अलार्म वाजू लागला. हा मेसेज केंद्र सरकारच्या ‘दूरसंचार विभाग’ (Department of Telecommunications) कडून पाठवण्यात आला होता. स्क्रीनवर “Emergency Alert: Severe” असे लिहून येत होते. अशा प्रकारचे मेसेजेस किंवा अलार्म आल्यास घाबरू नका. हा सरकारचा एक तांत्रिक उपक्रम असून सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. इंटरनेट नसतानाही हे अलर्ट्स मोबाईलवर येऊ शकतात. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. भारत सरकारकडून ‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी’ (NDMA) च्या मदतीने राबवण्यात येत असलेल्या ‘पब्लिक सेफ्टी अलर्ट सिस्टीम’ ची ही एक चाचणी (Testing) आहे.
हे अलर्ट्स का महत्त्वाचे आहेत?
१. आपत्तीच्या काळात (उदा. पूर, चक्रीवादळ किंवा भूकंप) नागरिकांना त्वरित सावध करण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.
२. ही प्रणाली रेडिओ किंवा टीव्हीशिवाय थेट नागरिकांच्या हातात असलेल्या मोबाईलवर माहिती पोहोचवण्यास सक्षम आहे.
३. ही चाचणी फक्त यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी केली जात आहे.







