मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली असून, दूध, पनीर आणि गुटखा माफियांवर धडक कारवाईनंतर आता रस्त्यावरील तसेच हॉटेल्समधील चायनीज फूड स्टॉल्स प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित जाहीर मुलाखतीत बोलताना, “आता चायनीज फूडकडेही थोडं लक्ष द्यायचं आहे,” असे सांगत या क्षेत्रात लवकरच कठोर तपासणी मोहीम राबविण्याचे संकेत दिले. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत एफडीएची विशेष पथके राज्यातील विविध शहरांतील चायनीज स्टॉल्स आणि हॉटेल्सची तपासणी करणार आहेत. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व निकषांची काटेकोर पडताळणी केली जाणार आहे. विशेषतः चिकन लॉलीपॉप, मंचुरियन आणि इतर चायनीज पदार्थांना आकर्षक लाल रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रासायनिक रंगांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या अशा रंगांचा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मुंबईतील काही रेस्टॉरंट्सनी यापूर्वीच कृत्रिम लाल रंगाचा वापर बंद केल्याची माहिती समोर आली असून, आता ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एफडीएच्या तपासणीत केवळ कृत्रिम रंगच नव्हे, तर चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो, विविध प्रकारचे सॉस, त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितताही तपासली जाणार आहे. निकृष्ट दर्जाचे किंवा नियमबाह्य घटक वापरले जात असल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होईल. याशिवाय एकाच खाद्यतेलाचा वारंवार वापर करून पदार्थ तळले जात आहेत का, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. वारंवार वापरलेले तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे अशा तेलाचा वापर करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. स्टॉल्स आणि हॉटेल्समधील स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, साठवण व्यवस्था तसेच अन्न सुरक्षा मानकांचे पालन केले जाते का, याचीही सखोल तपासणी होणार आहे. संबंधितांकडे वैध एफएसएसएआय (FSSAI) परवाना आहे का, त्याचे नूतनीकरण वेळेवर झाले आहे का आणि आवश्यक नियमांचे पालन केले जाते का, याची पडताळणी केली जाणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश एफडीएने दिला असून, भेसळमुक्त आणि सुरक्षित अन्न नागरिकांपर्यंत पोहोचावे, हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






