पिंपरी : ‘देहू आणि आळंदी या तीर्थस्थळांतून वाहणाऱ्या इंद्रायणी आणि पवना या नद्या स्वच्छ करण्याची वारकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. दोन्ही नद्या स्वच्छ करण्यासाठी विकास आराखडा (डीपीआर) येत्या दोन महिन्यांत तयार करण्यात येणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होईल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्णत्वाला जाईल. नदी स्वच्छतेच्या कामाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे,’ अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (२२ जून) केली. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंद्रायणी आणि पवना नदीतील जलप्रदूषणावर नियंत्रणात्मक उपाययोजनांसाठी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरावरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, ‘पीएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत लवकरच पाहणी करावी. सरकारी निधी आणि शासकीय संस्थांच्या सहभागातून शुद्धीकरण प्रकल्प राबवावा. या कामासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असावा,’ असेही सामंत यांनी सुचवले. ‘नदी स्वच्छ झाल्याने नागरिक आणि वारकऱ्यांचा फायदा होईल,’ असे स्पष्ट करीत सामंत यांनी येत्या ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पाच्या निविदा काढाव्यात. त्यानंतर दोन वर्षांत प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल, असे नियोजन करण्याच्याही सूचना केल्या. विकास आराखड्यानुसार रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या ९२ लघुउद्योजकांच्या स्थलांतरासाठी चऱ्होली येथे दहा एकर जागा उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘देहू-आळंदी येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून; तसेच परराज्यांतून भाविक येतात. ते इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यामुळे नदी प्रदूषणाच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा,’ अशी विनंती बारणे यांनी केली. सिंह यांनी नदी प्रदूषणावरील नियंत्रणाबाबत केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. ‘नाल्यांद्वारे नदीमध्ये कचरा, प्लास्टिक, दूषित पाणी जाऊ नये यासाठी ‘मेकॅनिकल स्क्रिन’ लावण्यात आल्या आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे,’ असेही सिंह यांनी नमूद केले.




