मुंबई : मराठी प्रेक्षकांचे गेली अनेक वर्षे भरभरून मनोरंजन करणाऱ्या लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमावर शोककळा पसरली आहे. कार्यक्रमाच्या सृजन टीममधील विनोदी लेखक विजय कुमार राख यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली. या घटनेमुळे हास्यजत्रा टीमसह संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील विजय कुमार राख हे ग्रामीण जीवनाचे बारकावे टिपणारे आणि विनोदाची उत्तम जाण असलेले होतकरू लेखक म्हणून ओळखले जात होते. ऐन तारुण्यात त्यांचे झालेले निधन हा कलाक्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये, “हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने हास्यजत्रा टीम आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला असून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पोस्टवर अनेक कलाकार, चाहते आणि सहकाऱ्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, समीर चौघुले यांसारखे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र, पडद्यामागे कार्यरत असलेल्या लेखकांच्या टीमचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. विजय कुमार राख यांच्या निधनामुळे हास्यजत्रा परिवाराने एक गुणी आणि संवेदनशील लेखक गमावला आहे.





