मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल तीन दशकांनंतर मुंबईला एक नवं रेल्वे टर्मिनस मिळणार असून, पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी येथे नव्या टर्मिनसच्या कामाची अंतिम मुदत जाहीर केली आहे. हे टर्मिनस कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या मुंबईत दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशी प्रमुख टर्मिनल्स कार्यरत आहेत. आता या यादीत जोगेश्वरी टर्मिनसची भर पडणार असून, यामुळे दादर आणि सीएसएमटीसारख्या अतिगर्दीच्या स्थानकांवरील भार कमी होण्याची अपेक्षा आहे.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या सहाय्यक टर्मिनल (एटी) यार्डमध्ये हा प्रकल्प विकसित केला जात आहे. आतापर्यंत केवळ गाड्या उभ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या यार्डमध्ये प्रवासी वाहतूक नव्हती. मात्र, टर्मिनस सुरू झाल्यानंतर हे स्थानक मुंबईच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे जाळ्याचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७६.४८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर दररोज २४ लांब पल्ल्यांच्या गाड्या हाताळण्याची क्षमता या टर्मिनसला असेल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प मूळतः डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र जागेसंबंधी अडचणी आणि करारविषयक कारणांमुळे कामाला विलंब झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार, पहिला टप्पा जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.







