मुंबई : लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकल विस्कळीत झाल्यावर अनेक संकटांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसंच, गर्दीचे नियोजन कारवे, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून केली जाते. आता प्रवाशांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी व सूकर होणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुंबई विभागातील प्रवाशांचा एकूण प्रवास सुलभ करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली. येत्या पाच वर्षात सुमारे २५० लोकल सेवांची भर पडेल. तसेच १०० मेल एक्स्प्रेस गाड्यांची भर पडेल. संपूर्ण महाराष्ट्रात होणारा मल्टिपल मेगा टर्मिनसचा विकास, हा भविष्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमधील विकासाला चालना देईल.
महाराष्ट्रात सध्या एकूण १.३ लाख कोटी रुपयांचे काम प्रगतीपथावर असून, त्यापैकी ५८७७ किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्याचे ४१ प्रकल्प चालू आहेत. याचा खर्च रु. ८१,५८० कोटी इतका आहे. यामध्ये नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, आणि गेज रूपांतरण या कामाचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रेल्वेची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे, २०१४ पासून गेल्या १० वर्षांत विक्रमी ९२९ रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरब्रिज बांधण्यात आले, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांमध्ये महाराष्ट्रात नवीन लोहमार्ग बांधण्याच्या कामाला गती मिळाली असून, वर्षाला सरासरी १८३ किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्यात आले. २००९-२०१४ दरम्यान बांधण्यात आलेल्या वार्षिक सरासरी ५८ किमीपेक्षा ते ३ पट अधिक असल्याचे ते म्हणाले. नवीन रुळांच्या बांधकामाबरोबरच विद्युतीकरण करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांचे आता १००% विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५,९४० कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. २००९ ते १४ या कालावधीत महाराष्ट्राला देण्यात आलेल्या वार्षिक सरासरी रु. ११७१ कोटी अर्थसहाय्याच्या ते जवळजवळ १३.५ पटीहून अधिक असल्याचे ते यावेळी म्हणाले.