पुणे : वाहतुकीच्या नियमभंगाची कारवाई राज्यभर ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून ऑनलाइन होत असल्यामुळे अनेक वाहनचालकांच्या नावावर हजारो रुपयांचा दंड थकीत आहे. मात्र, या दंडाचा फायदा वाहतूक व जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांकडून घेतला जात आहे. गाडीवर दंड किती आहे, हे पाहून चालकास अडविले जाते. हजारोंचा दंड असल्यामुळे चालक ‘सेटलमेंट’ करून जातात. मात्र, या वेळी पोलिसांच्या उद्देश दंड वसूल करणे हा नसून ‘सेटलमेंट’ हाच असल्याचे काही ठिकाणी दिसून आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आहे.
पुणे शहरात अनेक ठिकाणी पोलिस चौकापुढे उभे राहून निययभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करतात. मात्र, काही पोलिस चौकात उभ्या असलेल्या वाहनांचे फोटो काढून त्यांच्यावर किती दंड थकीत असल्याची पाहणी करतात. काही ठिकाणी तर फक्त वाहनांना अडवून त्यांच्या वाहनांवर थकीत दंड तपासला जातो. एखाद्या वाहनांवर हजारो रुपयांचा दंड थकीत असल्याचे आढळून आल्यास त्या वाहनचालकास बाजूला घेतले जाते. त्यांना वाहनावर दंड थकीत असून, तो भरण्यास सांगितले जाते. वाहनचालक सुरुवातीला एवढा दंड कसा काय, मी नियम पाळतो, एवढे पैसे नाहीत, नंतर दंड भरतो, अशी कारणे सांगतात. मात्र, पोलिसांकडून दंड भरण्यास सांगितल्यानंतर चालक तडजोडीला येतो. काही रक्कम हातावर टेकवून सुटका करून घेतो. बऱ्याच वाहतूक पोलिसांना याचा अंदाज आल्यामुळे त्यांच्याकडून अशी ‘सेटलमेंट’ सुरू आहे. त्यांच्याकडून दंड वसुल करण्यावर भर देण्यापेक्षा अशी सावज शोधण्यावर लक्ष असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील अशीच स्थिती असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. पाऊस झाल्यामुळे नागरिक सध्या जिल्ह्यात पर्यटनाला जातात. पर्यनटस्थळी अशा पद्धतीने वाहनांवर दंड किती आहे, याची तपासणी पोलिसांकडून केली जाते. दंड थकीत असल्याच तो भरण्यास सांगितले जातो. मात्र, नागरिक पर्यटनाच्या ‘मूड’मध्ये असतात; तसेच, अनेकांकडे मोठी रक्कमदेखील नसते. त्यामुळे त्यांच्याकडून काही रक्कम हातावर टेकवून सुटका करून घेतली जात आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या दंडाची थकबाकी वाढत असताना पोलिसांकडून वेगळेच उद्योग सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त कशी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.