मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिला राखीव डब्यांमध्ये रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात राहणार आहेत. यापूर्वी ही सुरक्षा व्यवस्था सकाळी ६ वाजेपर्यंतच मर्यादित होती. मात्र सकाळच्या वेळेत महिला डब्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेऊन हा कालावधी दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढती गुन्हेगारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी २३ जून रोजी नालासोपारा येथे एका तरुणाची रेल्वेत झालेली हत्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत आमदार चित्रा वाघ यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत रात्री ९ ते सकाळी ६ या विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा कालावधी सकाळी ८ वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी केली. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत नव्या निर्णयाची घोषणा केली.
यावेळी रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींच्या वावराचा मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे आमदार ॲड. अनिल परब यांनी रेल्वे स्थानक परिसरात अशा व्यक्तींचा वाढता उपद्रव आणि साध्या वेशातील पोलीस दिसत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेल्वे स्थानक परिसरात देखरेखीसाठी अधिक चित्रण यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होतो, याचा शोध घेण्यासाठी पुढील १५ दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांसोबत विशेष बैठक आयोजित केली जाईल. पुढील २५ दिवसांत अशा व्यक्तींची नोंद तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी रेल्वे अपघातांमध्ये दररोज सरासरी १० जणांचा मृत्यू होत असल्याची गंभीर बाब मांडली, तर आमदार राजहंस सिंह यांनी प्रत्येक रेल्वे डब्यात शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली. मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि निर्भय करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिले.







