वसई : राज्य परिवहन महामंडळाची म्हणजेच एसटीची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्यभर सुरू करण्यात आलेल्या ‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाची सुरुवात वसई तालुक्यातही करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी एसटी सेवा ही राज्याची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत खासगी बससेवा, बसेसचा घसरलेला दर्जा आणि सुविधांचा अभाव यामुळे एसटीकडील प्रवाशांचा ओढा कमी होत असल्याचे चित्र होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ‘आपली बस, आपली सेवा’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून या मोहिमेला सुरुवात झाली. वसई, अर्नाळा आणि नालासोपारा बस आगारांमध्येही हे अभियान राबविले जात असून प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालक आणि वाहकांकडून प्रवाशांशी सौजन्यपूर्ण संवाद साधणे, बससेवेचा वक्तशीरपणा वाढवणे, बसस्थानक आणि बस परिसरात स्वच्छता राखणे तसेच प्रवाशांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या अभियानांतर्गत बस प्रवास सुरू होण्यापूर्वी चालक प्रवाशांना स्वतःची ओळख करून देत असून प्रवासाचा मार्ग, महत्त्वाचे थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देत आहेत. नालासोपारा आगार प्रशासनाच्या माहितीनुसार, बस सुटण्यापूर्वी तिची अंतर्गत स्वच्छता आणि तांत्रिक तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध सुविधा आणि उपक्रमांची माहितीही या मोहिमेद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचवली जात आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षण, हंगामी विशेष बससेवा आणि एनसीएमसी कार्ड नोंदणी यांसारख्या योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. काही काळापासून एसटीपासून दूर गेलेले प्रवासी पुन्हा या सेवेकडे वळावेत आणि त्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुलभ प्रवास अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अभियानामुळे एसटीच्या सेवेकडे प्रवाशांचा विश्वास पुन्हा वाढत असल्याचेही चित्र दिसत आहे.







