ठाणे : देशभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा अनेक भाविकांच्या मनात असते. मात्र, प्रवासाचे नियोजन, राहण्याची व्यवस्था आणि विविध ठिकाणी पोहोचण्याच्या अडचणींमुळे अनेकांना हा अनुभव घेता येत नाही. अशा भाविकांसाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) यांनी ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’ अंतर्गत विशेष धार्मिक पर्यटन यात्रा आयोजित केली आहे. ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ या नावाने आयोजित करण्यात आलेली ही विशेष रेल्वे यात्रा ११ रात्री आणि १२ दिवसांची असून, ती २१ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथून रवाना होणार आहे. या यात्रेदरम्यान प्रवाशांना राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार आहे. या पॅकेजमध्ये उदयपूर, नाथद्वारा, पुष्कर, जोधपूर, जयपूर, खाटू श्यामजी आणि उज्जैन या प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक दर्शनाबरोबरच राजस्थानच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि राजेशाही वारशाचा अनुभव घेण्याची संधीही भाविकांना मिळणार आहे. विविध वयोगटातील प्रवाशांना सोयीस्कर आणि नियोजनबद्ध प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी संपूर्ण यात्रेची आखणी करण्यात आली आहे.
या विशेष पर्यटन पॅकेजमध्ये केवळ रेल्वे प्रवासच नव्हे, तर राहण्याची, स्थानिक वाहतुकीची आणि भोजनाचीही संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना एसी तसेच नॉन-एसी डब्यांमधून प्रवासाचा पर्याय उपलब्ध असून, बजेट हॉटेलमध्ये डबल, ट्रिपल आणि क्वाड शेअरिंग पद्धतीने निवासाची सुविधा दिली जाणार आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, विविध पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी एसी आणि नॉन-एसी वाहनांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवास विम्याचाही या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण यात्रेदरम्यान आयआरसीटीसीचे अनुभवी टूर मॅनेजर प्रवाशांसोबत राहून आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. या विशेष रेल्वेला महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. सोलापूर, कुर्दुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवर रेल्वे थांबणार असल्याने या मार्गावरील भाविकांना सोलापूरपर्यंत स्वतंत्रपणे प्रवास करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे धार्मिक पर्यटनाचा आनंद अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेण्याची संधी भाविकांना उपलब्ध होणार आहे.





