मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात होणाऱ्या प्रचंड गर्दीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यासंदर्भात कडक निर्बंध लागू करत सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बैठकीच्या दिवशी मंत्र्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध नागरिक मोठ्या संख्येने मंत्रालयात उपस्थित राहतात, त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर आता मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एका अधिकृत व्यक्तीलाच मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस बैठकीला उपस्थित राहायचे असल्यास त्यांना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीने आवश्यक कागदपत्रे सचिव कार्यालय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असेल. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतात. तरीही बाहेरील गर्दीमुळे व्यवस्थापनावर ताण येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक असल्यास केवळ आमदार आणि खासदारांनाच वेटिंग रूममध्ये प्रवेश दिला जाणार असून, त्यांच्या स्वीय सहाय्यकांना बैठकीच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. यासोबतच बैठकीपूर्वी आणि बैठकीनंतर दोन तास मंत्रालयातील संबंधित मजल्यावर कोणतीही इतर बैठक आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मंत्रालयातील शिस्त वाढण्याबरोबरच कामकाज अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.







