नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर न झाल्याने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का बसला असून या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडीनंतर सत्ताधारी आघाडी एनडीए आक्रमक झाली असून देशभरात विरोधकांविरोधात आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडेआठ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संबोधनात ते नेमके काय बोलणार, कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार आणि काही मोठी घोषणा करणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर पंतप्रधानांचा हा संवाद अधिक महत्त्वाचा मानला जात असून, ते देशातील सद्यस्थिती, सरकारची भूमिका आणि पुढील धोरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, सरकारच्या दीर्घ कार्यकाळात प्रथमच एखादे महत्त्वाचे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही, ही बाब राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएने तातडीची बैठक घेतली असून देशव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानुसार विविध ठिकाणी विरोधी नेत्यांविरोधात निदर्शने सुरू आहेत. पंतप्रधानांचे आजचे संबोधन या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकणारे आणि पुढील राजकीय दिशा ठरवणारे ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.







