मुंबई: महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर सरकारमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. महायुतीतील काही मंत्र्यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. या सगळ्यात शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. “भाजपा लवकरच एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल आणि शिवसेनेत नवा ‘उदय’ होईल,” असे सूचक विधान वडेट्टीवार आणि राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनीदेखील मोठे विधान केलं आहे. “राज्यात २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे,”असा दावा शेवाळे यांनी केला आहे. राहुल शेवाळे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानांना प्रत्युत्तर देताना मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “येत्या २३ जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदारांना वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत पसरवत आहेत.”
राहूल शेवाळे म्हणाले की, “काँग्रेसचे काही आमदार आणि ठाकरे गटातील काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची संख्या १० ते१५ नेते शिंदे गटात येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांमध्ये कुठेतरी फूट पडू शकते. दुसऱ्याच्या ‘उदया’पेक्षा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी त्यांनी घ्यावी.” या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून २३ जानेवारीला खरोखरच काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. “मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.’ महायुतीमध्ये सध्या अशीच काहीशी स्थिती दिसत आहे. नाराजी व्यक्त करून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी काही बोललो तर ते चुकीचे ठरेल.” असा टोला त्यांनी लागवाल आहे. तसेच, “सध्याच्या महायुतीतील परिस्थिती पाहता असा प्रश्न उपस्थित होतो की, एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? त्यांना स्वतःहून बाजूला करण्यासाठी त्यांच्या मित्रपक्षांकडून विविध प्रयत्न होत आहेत का, अशी शंका वाटते.” “ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांना पुढे आणले गेले, त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उद्या एक नवीन ‘उदय’ पुढे आणला जाईल. तो ‘उदय’ कोण असेल, हे मी सांगणार नाही, पण त्याला पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे चित्र दिसत आहे.” या विधानांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, महायुतीतील अंतर्गत घडामोडी आणि एकनाथ शिंदे यांच्या भविष्यासंदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.